तर आम्हाला तलवार चालवावी लागेल! : बच्चू कडूंचा थेट इशारा

यवतमाळ : राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांना कंटाळून आता रस्त्यावरचा आवाज अधिक तीव्र आणि आक्रमक होत चालला आहे. आमदार बच्चू कडू यांनी ‘सातबारा कोरा कोरा’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर एक संतप्त इशारा देत म्हटले, “तुमची लेखणी जर शेतकऱ्यांच्या हितासाठी चालत नसेल, तर आम्हाला तलवार चालवावी लागेल!”

राजकीय व प्रशासकीय बेपर्वाईने निर्माण झालेल्या अस्वस्थतेला आता नवसंजीवनी मिळाली आहे. छावा संघटनेने या यात्रेला ठाम आणि जाहीर पाठिंबा दिला असून, विदर्भाच्या मातीतील संताप आता निर्णायक आंदोलनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

“शासन झोपलंय, आम्ही उठलोय!” — असा निर्धार करत छावा संघटनेने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे, “हा केवळ आंदोलन नाही, ही आमच्या अस्मितेची लढाई आहे. सरकारला जर शेतकऱ्यांचा वेदना ऐकू येत नसेल, तर आम्ही त्यांच्या दारात आवाज घुमवू!”सातबारा अजूनही कोरा नाही, शेतमालाला हमीभाव मिळत नाही, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग यांना मूलभूत हक्कांपासून दूर ठेवले जात आहे. सत्तेच्या लेखण्या केवळ कागदावर धावत आहेत — जमिनीवर मात्र पोकळ आश्वासनांची वाळवंटे निर्माण झाली आहेत. बच्चू कडू यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उद्देशून स्पष्टपणे सांगितले, “शासनाच्या लेखणीला जर शेतकऱ्याच्या अश्रूंशी काहीही देणंघेणं नसेल, तर आम्हालाही आता तलवार चालवण्याची वेळ येईल!”

आता अंबोडा हे केवळ एका आंदोलनाचं ठिकाण राहिलेलं नाही, तर ते न्यायाच्या लढ्याचं रणभूमी ठरणार आहे. १४ जुलै रोजी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, मजूर, मेंढपाळ, मच्छीमार आणि वंचित घटक अंबोड्यावर एकवटत आहेत.

Post a Comment

0 Comments