यवतमाळ : ५० रुपयांच्या किरकोळ वादातून चिडून तिघांनी एका तरुणावर हल्ला करून त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील कोरटा गावात दिनांक १३ जून रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दराटी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता चिंतामण बरगे असे मृतकाचे नाव आहे. फिर्यादी कमल शिरडे (वय ५५, रा. कोरटा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक दत्ता चिंतामण बरगे याच्यावर आरोपींनी केवळ ५० रुपयाच्या वादावरून रागाच्या भरात प्राणघातक हल्ला केला. आरोपींमध्ये श्रीराम लक्ष्मण ऊर्फ गोदाजी तोरकड (२३), माधव मारोती तोरकड (३५) आणि लक्ष्मण ऊर्फ गोदाजी महादु तोरकड (७७) यांचा समावेश आहे. तिघेही कोरटा गावचे रहिवासी आहेत.
घटनेच्या दिवशी वाद झाल्यानंतर तिघांनी संगनमत करून दत्तावर हल्ला चढवला. त्याला हाताने मारहाण करण्यात आली. त्यानंतर श्रीरामने दत्ताला उचलून जोरात जमिनीवर आपटले आणि पोटात लाथा मारली. या मारहाणीत दत्ताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दराटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
0 Comments