यवतमाळ : हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक, आत्महत्याग्रस्त व गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात आले. सलग १५ वर्षे सुरु असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदा ११०० शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ३०० शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून कर्जासाठी टाळाटाळ सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मनसेने पुढाकार घेत तीन एकर शेतीसाठी प्रत्येकी तीन पाकिटं कापूस आणि दोन पाकिटं तुरीच्या बियाण्यांचे वाटप केले. यवतमाळ तालुक्यातील इचोरी, तिवसा, वडगाव, सावरगाव, चिचघाट, वाई हातोला, यवतमाळ ग्रामीण या भागांतील शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला.
"सरकार दरवर्षी शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करत असली तरी त्या बहुतांश वेळा केवळ कागदावरच राहतात. मात्र मनसे सत्ता नसतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून मदत करत आहे," अशी टीका मनसेचे जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांनी यावेळी केली.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भंपक उत्सव न करता गरजूंच्या मदतीचा संकल्प मनसेने यंदाही जपला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments