यवतमाळ : केदारनाथ दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी आजचा दिवस काळरात्र ठरला. रविवार १५ जून रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास केदारनाथवरून गुप्तकाशीकडे निघालेले आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर (VTBKA / Bell 407) रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ तहसीलमधील गौरीकुंड परिसरात कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तिघांसह सात जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वणी (जि. यवतमाळ) येथील राजकुमार सुरेश जयस्वाल (वय ४१), त्यांची पत्नी श्रद्धा राजकुमार जयस्वाल (वय ३५) आणि त्यांची दोन वर्षांची चिमुरडी काशी राजकुमार जयस्वाल यांचा समावेश आहे. केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर ते गुप्तकाशीकडे परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात अन्य चौघांचाही मृत्यू झाला असून त्यामध्ये पायलट कॅप्टन राजबीर सिंह चौहान (जयपूर), बीकेटीसीचे विक्रम रावत (रा. रासी, उखीमठ), विनोद देवी (६६, उत्तर प्रदेश) आणि तृष्टि सिंह (१९, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू केले असून एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीआरएफ, तसेच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून फॉरेन्सिक आणि डीएनए नमुने घेण्यासाठी तज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. वणीतील जयस्वाल कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. केदारनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्घटनेतील अधिक माहिती आणि मदतीसाठी खालील हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे.
0 Comments