यवतमाळमध्ये युवकाची हत्या, चार संशयित ताब्यात

यवतमाळ : यवतमाळ शहरात एका 28 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून, दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या घटनेचा बदला घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृत युवकाचे नाव मनीष उर्फ मन्या शेंद्रे असून तो सेजल रेसिडेन्सी परिसरात राहात होता. तो दुचाकी दुरुस्तीसाठी चांदणी चौकातील गॅरेजवर आला असताना चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. दोन हल्लेखोर आधीच एका ऑटोरिक्षामध्ये थांबलेले होते, तर उर्वरित दोघं नंबर नसलेल्या दुचाकीवर आले होते. त्यांनी तलवार आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी मनीषवर वार केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर मनीषने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मागे कोसळला आणि नंतर वन विभागाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर वार केले. यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शहर पोलीस, एलसीबीचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशी सुरू आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या हत्येचा सूड?

दोन वर्षांपूर्वी, कलंब चौकात छेडछाडीच्या आरोपावरून मनीष शेंद्रेने एका युवकावर गोळी झाडली होती. त्या घटनेत युवकाचा मृत्यू झाला होता. मनीषला अटक झाली होती. एक महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, त्याच घटनेचा बदला घेण्यासाठीच ही हत्या झाली असावी.

गळ्यात अडकलेला शस्त्र 

पोलीस सूत्रांच्या हल्ल्यावेळी वापरलेला एक चाकू मनीषच्या गळ्यात अडकलेला होता. या हत्येच्या भीषणतेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रास्ता रोको आंदोलन

या घटनेच्या निषेधार्थ मृतकाच्या नातेवाईकांनी एलआयसी चौकात रास्ता रोको आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


Post a Comment

0 Comments