ब्रेकींग: अधर पुस प्रकल्पात वीज कोसळली; ५० हून अधिक जनावरे मृत्युमुखी!

उमरखेड (यवतमाळ) : सुनिल ठाकरे

.................. 

वेणी अधर पुस प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये वादळी वाऱ्यासह वीज कोसळल्यामुळे ५० ते ६० पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाय, बैल, म्हैस व कालवडी अशा सुमारे १०० ते १३० जनावरे चरण्यासाठी गवतात गेलेली असताना ही दुर्घटना घडली.

धारकान्हा हे गाव डोंगरगाव गट ग्रामपंचायत हद्दीत असून दुर्गम भागात वसलेले आहे. काल सायंकाळच्या सुमारास अचानक वादळाने जोर धरला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी अनेक जनावरे धरणाच्या काठावर उथळ पाण्यात विसावलेली होती. त्याच वेळी वीज पाण्यात कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेकडो जनावरे गवताळ भागात गेलेली असताना ५० ते ६० जनावरे जागीच मृत्युमुखी पडली, तर काही गाळात अडकली असून ४० ते ४५ जनावरे गावात परतली आहेत. मृत जनावरांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तलाठी खोसे, सरपंच, पोलिस पाटील आणि गावकरी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, या मृत्यूचे खरे कारण वीज पडल्यामुळेच आहे की यामागे अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले असून, पोस्टमार्टम अहवालानंतरच नेमका कारणस्पष्ट होणार आहे.

गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून, अजूनही काही जनावरे बेपत्ता असल्याने शोधकार्य सुरू आहे. प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments