यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळांनी आज बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. निकाल माहित होण्यापूर्वीच बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना आज पाच मे रोजी दुपारी यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली. या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
हिना ज्ञानेश्वर आडे वय १७ रा पांढुर्णा ता. यवतमाळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नेर येथील दि इंग्लिश स्कूल येथे बारावीत शिक्षण घेत होती. आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. हिना हिच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने तिने आपल्या भावाला निकाल पाहण्यासाठी सांगितले होते. भाऊ व वडील हे लग्नाला गेले होते. त्या ठिकाणी मोबाइलवर भावाने निकाल पाहिला. यामध्ये तीला 47 टक्के गुण मिळाले असून ती पास झाली होती. गुण कमी मिळाल्याने भावाने तीला किती गुण मिळाले हे न सांगता , घरी आल्यावर निकाल सांगतो असे तिला सांगितले होते. त्यामुळे आपण परीक्षेत फेल झाले की काय असा गैरसमज झाल्याने तिने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटूंबीय घरी परत आल्यावर हा प्रकार उजेडात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments